मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते , अंगातून घाम सतत पाझरत होता . मनाने तर संपच पुकारला होता , कशातच मन लागत नव्हते . 2 महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता . तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती . शरीर आता आराम मागत होते . तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला . मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले . बायकोने साहेबांचा कॉल असल्याचे सांगताच , मोहन ताडकन उठून बसत म्हणाला , " जेवणाच्या सुट्टीत पण पिच्छा सोडत नाहीत ही साहेब लोकं ." साहेबांशी बोलत असतानाच, त्याची कळी एकदम खुलली . साहेबांचे शब्द कानी पडताच मरगळ गळून पडली . लागलीच त्याने आपली वर्दीची टोपी उचलून , घराबाहेर पडला . " तुम्ही जेवूण घ्या , माझी तातडीची बैठक आहे . " एवढेच त्याने अंगणातून ओरडून बायकोला सांगितले . गाडीची किक मारताच त्याचे विचारचक्र सुरु झाले . साहेबांनी सांगितल्यानुसार 21 मे ला राजीव गांधी यांची प्रचार सभा होती . ते विशाखापट्टणम वरून पेरुम्बुदुर येथे रात्री 10.00 च्या सुमारास येणार होते . या सभेच्या संरक्षणासाठी साहेबांनी एक कमिटी स्थापन केली होती . त्याच्या प्रमुखपदी मोहनची नियुक्ती करण्यात आली होती . आपल्यावर सोपवलेल्या कामगिरीकडे तो एक संधी म्हणून बघत होता . ही जबाबदारी यशस्वीरित्या पेलवून साहेबांची शाबासकी मिळविण्याचा निर्धार त्याने केला . गाडी पार्क करताच त्याची विचारांची माला खंडित झाली . बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली . सर्वांना आपापली कामगिरी वाटून देण्यात आली . बंदोबस्तात कुठेही दिरंगाई होता कामा नये अशी साहेबांनी सर्वांना तंबी दिली . या प्रचार सभेला आठवडा अवधी असला तरी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक होते . असामी मोठी होती . सभेला जनसागर उसळणार ही भविष्यवाणी करण्याची गरज नव्हती , त्यासाठी नियोजनही तगडे लागणार होते .
-×-×-बंदोबस्त एकदम चोख होता . कुठेही गडबड , गोंधळ होवू नये म्हणून जागोजागी पोलिस तैनात केले होते . गेटपासून ते मंचाकापर्यंतचा रस्ता बराच अरुंद होता . कुणीही मध्येच रस्त्यात घुसू नये याची खबरदारी घेण्यात आली होती . एवढी सगळी तयारी करूनही मोहनला कुठेतरी चुकल्यासारखे वाटत होते . त्यामुळे त्याने पुन्हा एकदा खातरजमा करून घेतली . सर्व काही व्यवस्थित आहे कळल्यावर कुठे त्याला हायसं वाटलं .
मंचकाच्या डाव्या बाजुला पेरुम्बुदुरचे प्रसिद्ध छायाचित्रकार हरिबाबू सुद्धा कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी आले होते . ते शालेय गणवेशात उभ्या असलेल्या कोकीळावाणीशी गप्पा मारत होते . कोकीळावाणीच्या आईच्याच प्रचार सभेसाठी राजीव गांधी येणार होते . राजीव गांधींना , कोकीळा आपण बनवलेली कविता ऐकवणार होती . हरिबाबूंनी मोहनला हात उंचावून ओळख दाखवली , मोहनने सुद्धा प्रतिसाद दिला . हरिबाबूंच्याच मागे एक पुरूष , पांढरा सदरा व पायजामा घातलेला . दोन स्त्रिया - एक साडी नेसलेली तर एक पंजाबी ड्रेस . पंजाबी ड्रेस वालीच्या हातात चंदनाचा हार होता , चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते , केसांमध्ये फुलांचा गजरा माळलेला होता . हे सर्व मोहनच्या चाणाक्ष नजरेने टिपले होते पण , असेल कुणी हरिबाबू किंवा कोकीळावाणीच्या ओळखीचे म्हणून त्याने त्यांच्याकडे कानाडोळा केला . पण वास्तविक पाहता हरिबाबूंच्या मागचे तिघेही कुणाच्याच ओळखीचे नव्हते .
![]() |
| राजीव गांधी समवेत शालेय गणवेशात कविता वाचताना कोकीळावाणी, तिच्याच मागे डोक्यावर गजरा असलेली मानवी बॉम्ब. |
![]() |
| याच मैदानावर राजीव हत्या घडवण्यात आली. |
![]() |
| हत्येनंतर राजीवजींच्या गणवेशाचे अवशेष. |
या घटनेचा मोहनवर इतका गंभीर परिणाम झाला की , त्या दिवसापासून त्याची वाचा गेली . तो कुणालाही प्रतिसाद देत नाही . त्याचे नैसर्गिक विधींवर पण नियंत्रण राहिले नाही . एकूणच त्याचा संपूर्ण शरीरावरचा ताबा सुटला आहे . नियंत्रणात आहेत ते फक्त डोळे , त्यांना खुप काही सांगायचंय , त्यांची व्यथा मांडायचीय , त्यांनी काय काय अनुभवलय सर्व काही सांगायचंय , पण तुर्तास आसवे गाळण्यापलिकडे ते काहीही करू शकत नाहीत.....
To be continued........



Comments
Post a Comment