Skip to main content

पैठणी दिवस-१

                                                                              . झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते. आमची नेमणूक महाविद्यालयाकडून पैठणच्या ग्रामीण रुग्णालयात होत असते. तेथे रुजू होण्याचीच ही तयारी सुरू होती. 
‌                      पैठणच्या प्रशिक्षणाचे भरपूर किस्से ऐकलेले होते. धरण, मंदिर, मन्नूचा ढाबा, उद्यान, शौकत भाईची बिर्याणी यांची तोंडओळख आम्हाला वरिष्ठांकडून आणि आमच्या आधी सेवा देऊन परतलेले वर्ग मित्रांकडून झालेली होती. आता ह्याच गोष्टी प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ आलेली होती. एकूणच उत्सुकता खूप शिगेला पोहोचली होती. 4 नोव्हेंबर 2016, शुक्रवार रोजी आम्ही राहतं वसतिगृह सोडलं. एका महिन्यासाठी आम्ही स्थलांतर करणार होतो. राहत्या वसतिगृहात आम्हाला प्रत्येकी एक खोली होती. पैठणला मात्र एका खोलीत 4 डोकी असणार होती. पण त्याची यत्किंचितही अडचण होणार नव्हती. याची लवकरच प्रचिती आली. प्रशिक्षण कालावधीत कधीही एकांताची गरज भासली नाही. उलट या गोंधळातच गोकुळ गवसल्याचा आनंद झाला. लवकर आवरायचं म्हणता म्हणता 11 वाजले. सुरज, सुमीत, अक्षय, विवेक, शुभम, रवि, सुधीर आणि मी. इतके 8 जण सोबत निघणार म्हणजे उशीर तर होणारच ना! 
‌                 " चला नाथांच्या गावा."
‌               आम्हा 8 जणांपैकी मोटारसायकल फक्त दोघांकडेच होती. समानासहीत एका गाडीवर फक्त दोघांना जाता येणार होते. उरलेल्या चौघांना महामंडळाच्या कृपेनेच जावे लागणार होते.
‌                नेमकीच दिवाळी संपली होती म्हणून लाल परीत गर्दी असेल असा अंदाज होताच. पण गाडीत पाय टाकायलाही जागा नसेल याची कल्पना नव्हती. बसस्थानकावर उभी असलेली पैठणला जाणारी बस तुडुंब भरलेली होती. दुरूनच गर्दी पाहून अवसान गळाले. एकटे असतो तर कसेही 'काका, मामा' म्हणत प्रवास केला असता. पण जवळ सामानही भरपूर होते. इतक्या गर्दीत गाडीत चढण्याचा तर प्रश्नच नव्हता. 
‌                  त्या गाडीत कंडक्टर (वाहक) मामा सर्वात शेवटी चढला. दरवाजा लावताना त्यालाही खोल श्वास घेऊन, ढेरी आत ओढून दरवाजा लावावा लागला. आता पुढच्या बसची वाट पाहण्याशिवाय इलाज नव्हता. चौकशी कक्षात विचारपूस केल्यावर समजले की दर अर्ध्या तासाला पैठण गाडी आहे. पण मग अर्ध्या तासात जर भरपूर गर्दी जमली तर पुन्हा कंडक्टर साहेबांवर ढेरी आत ओढण्याची पाळी येणार होती. पण सुदैवाने गाडी १० मिनिटांतच लागली आणि आम्हाला सर्वांना आरामशीर जागा मिळाली. (खिडकीतून रुमाल न टाकता) आणि हो आमचे कंडक्टर मामा पण निवांत गाडीत चढले. :)
‌                   एका अर्धशतकीय गृहस्थांच्या बाजूला मला गाडीत जागा मिळाली. तोबरा भरलेला होता, जीभ रंगलेली होती बहुदा पान असावे. भाळी अष्टगंध, गळ्यात माळ अंगात कुडता-पायजमा असा वेष बाबांचा होता. त्यांनी बिडकीन चे तिकीट काढले होते. बिडकीन येईपर्यंत त्यांनी समाधी लावली. गाडी बिडकीनच्या बसस्थानकात लागल्यावर बाबांनी डोळे उघडले. खाकरा करून तोंडातील सर्व चघळत असलेलं बसस्थानकाला खिडकीतून अर्पण केलं. बसस्थानक बाबांसाठी कचरापेटीच जणू. मला वाटलं बाबा आता बिडकीन आल्यामुळे प्रस्थान करतील, पण ते परत समाधी अवस्थेत गेले. अलीकडील गावाचे तिकीट काढून पलीकडील गावाला जाणारे भोंदू प्रवृत्तीचे लोक आपणही पाहिले असतील. गर्दीचा फायदा बाबांनी व्यवस्थित उचलला होता. असो. 
‌                  औरंगाबाद ते पैठण इनमिन ५० किमी च्या अंतरासाठी आम्हाला दोन-अडीच घंटे मोजावे लागले होते. या उशिरामागे रस्त्यांमधील खड्डयांचे भरपूर योगदान होते. त्यावेळी दुचाकी वर येणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांच्या पाठीच्या मणक्यांची चिंता मला लागून होती. बस तरी मोठ्या चाकांमुळे छोट्या खड्डयांना जुमानत नाही. पण दुचाकी मात्र प्रत्येक खड्डयाचा पाहुणचार घेत मार्गक्रमण करते. एक खड्डा चुकवला की गाडी त्या पेक्षा मोठ्या खड्डयात गेलीच म्हणून समजा. ध्येयाकडे जाताना रस्ता किती खडतर आहे याचा विचार करायचा नसतो या आशयाचे सुभाषित वाचले होते. पण रस्ता इतका खडतर असू शकतो याची कल्पना नव्हती. :) अशाप्रकारे ब्रेकडान्स करत, राजकारण्यांच्या नावे दात इचकत आमची गाडी पैठण बसस्थानकाला लागली. 
‌              गाडीतून उतरल्यानंतर आदर्श गृहास्थाश्रमी समजल्या जाणाऱ्या संत एकनाथांची जन्मभूमी आणि समाधीस्थळ असणारे ते हेच पैठण का? असा प्रश्न मला पडला. स्थानकाच्या कोपऱ्यात कचरा मावत नव्हता. भिंती पान आणि तंबाखूच्या पिचकाऱ्यानी रंगलेल्या होत्या. चहूकडे वाढदिवसाचे, अभिष्टचिंतानाचे फलक झळकत होते. पण माऊली म्हणा, एकनाथ महाराज म्हणा, कोणाही संतांचे चित्र नजरेस पडले नाही. ही नक्कीच खेदजनक गोष्ट होती. पैठण म्हंटल की जो भक्तीभाव मनात दाटून यायचा तस चित्र मात्र इथे नव्हतं. पर्यटन क्षेत्र किंवा श्रद्धास्थान या ठिकाणी लागणारी स्वच्छता मात्र निश्चितच तेथे नव्हती. शहरातील रस्ते तसेच दळभद्री. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता त्या खड्डयालाच माहीत. :) शहरात धूळ तर इतकी होती की आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी येई पर्यंत चेहऱ्यावर पैठणी मातीचा लेप चढला होता. सगळे भुरक्या तोंडाची माकडे दिसत होती. आतापर्यंत तरी आम्हाला पाहिजे तस पैठणच दर्शन झालं नव्हतं. अश्या वातावरणात कसा एक महिना कटणार काय माहित म्हणून मन खट्टू झाले होते...पण हळूहळू नाथांच्या नगरीने आम्हाला तिच्या प्रेमात पडण्यास भाग पाडले.....

‌क्रमश:

Comments

  1. Ek number saurya.. ����
    Waiting for second part

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुरज...हा ब्लॉग आपल्या मैत्रीला अर्पण मित्रा😊

      Delete
  2. Replies
    1. तुमचा experience पण खूप भारी असणार सर😉

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पैठणी दिवस भाग-३

.   बाह्यरुग्ण विभागामध्ये मलमपट्टी विभागात काम करायला मला विशेष आवडत असे. रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. 'जखम कशी झाली' या विषयाद्वारे रुग्ण आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत. त्यांच्याकडून मग मी पैठण शहराची माहिती, प्रेक्षणीय स्थळे, खाऊ गल्ली यांची माहिती अलगद काढून घेत असे.                                          असेच एके दिवशी मध्यम वयाचे गृहस्थ आपल्या वडिलांना घेऊन मलमपट्टी विभागात आले. दोघेही एकमेकांवर मारवाडी भाषेत ओरडत आले. वडील मुलाला म्हणत होते, 'मला नाही करायची पट्टी बिट्टी'. त्यांचा मुलगा पण त्यांना प्रतिउत्तर देत होता. आत आल्यानंतर मात्र ते शांत झाले. त्यांना पायाला मोठी जखम (ulcer) झालेली होती. ती खूप खूप दिवसांपासून बरी होत नव्हती. अर्थात काळजी घेण्यात दिरंगाई होत होती. जखम भरत नाही म्हणजे आहार पण निकृष्टच असावा. जखमेचा भाग काळसर पडत चालला होता. त्यात भरपूर घाण साठली होती. त्यांची जखम व्यवस्थित साफ करून मलमपट्टी केली. पण...

दत्तू किटे

        .        23 जुलै 2017 वार रविवार, रविवारी रात्री आमच्या मेस(खानावळ) बंद असायच्या. नाईलाजाने (नाईलाजाने कसलं हो ! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येत. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या 4 रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवल्या जायचा. अधात मधात बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तश्या आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी(co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस(लोकशाहीच्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधी तरी). तर आठवाड्यातले 6 दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसल्या जायचा. पाऊले आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून 14-15 कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची ...