Skip to main content

दत्तू किटे

        .
       23 जुलै 2017 वार रविवार, रविवारी रात्री आमच्या मेस(खानावळ) बंद असायच्या. नाईलाजाने (नाईलाजाने कसलं हो ! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येत. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या 4 रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवल्या जायचा. अधात मधात बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तश्या आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी(co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस(लोकशाहीच्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधी तरी). तर आठवाड्यातले 6 दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसल्या जायचा. पाऊले आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून 14-15 कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची मैफिल रंगायची. नेहमीचे सदस्य म्हणजे गोपी, किसना, जब्या, पक्या, पिऱ्या आणि गुल्लू दादा(म्हणजे मी). त्यादिवशी रविवार असल्यामुळे या दिनचर्येला अपवाद नव्हताच.

          मस्त महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला असतानाच आमच्याही मैफिलीला झिंग चढली होती. स्टार्टर म्हणून नागेली पापड सोबत मसाला( हा मसाला म्हणजे कांदा, टोमॅटो बारीक चिरून त्यावर लिंबाचा हलकासा छिडकारा. चवीला मीठ, चटपट मसाला आणि तिखट) बिना मसाल्याचा नागेली पापड म्हणजे झिरो आहे राव झिरो. अख्ख्या संभाजीनगरात चरून झालंय पण साईकृपाच्या नागेली पापडाची सर कुणालाच येत नाही. फक्त नागेलीसाठी औरंगाबाद 14-15 कि.मी. बऱ्याचदा मागे टाकलंय आम्ही. चकना म्हणून चिकन मसाला(हा कोण चिकन बनवण्याचा मसाला नाही बरं.. ही एक डिश आहे भारी) म्हणजे एकदम आहाहाहा....!

               या सगळ्यांचा आस्वाद घेत हॉटस्टार वर आम्ही सामना बघत होतो. हरमनप्रीत खेळत असल्यामुळे भारताने एव्हाना जश्नाची तयारी सुरू केली होती. पक्याने सगळ्यांना मोबाईल बंद करण्यास सांगितले. फक्त सामना ज्या मोबाईलवर बघत आहोत तो सुरू ठेवूयात असे सुचवले. आम्हाला कळत नव्हते हा असं का म्हणतोय ते. जब्यानेही त्याला पुष्टी जोडताच आम्ही जास्ती खोलात न जाता मोबाईल बंद करून सामना बघण्यात गुंग झालो. थोड्या वेळाने गोप्याला एक कॉल आला(त्याकडे 2 मोबाईल होते. त्याने एकच बंद केला होता). म्हणून तो थोडा बाहेर जाऊन बोलू लागला. अर्धा-एक तास बोलल्यावर तो परत येताच त्याला सगळ्या माहोलचा इचका झालेला दिसला. भारतीय महिला फलंदाज निराश होऊन मैदान सोडत होत्या. शेवटच्या 5 फलंदाजांना 2 अंकी धावा पण जमवता आल्या नव्हत्या. हे इतकं अनपेक्षित होतं जणू कुणाची नजर लागावी. इंग्रज महिला 'दुगना लगान' वसूल झाल्याच्या खुशीत नाचत होत्या. पुरणपोळीचा घास त्यांनी 'ते बघ विमान आलं' म्हणून पळवून नेला होता. इकडे आमची झिंग उतरून डोळे घुबडासारखे एकमेकांकडे बघत होते. एव्हाना गोप्याला त्याची चूक कळाली होती, रडक्या सुरात तो म्हणाला, "कॉल दत्त्याचा होता." सगळ्यांनी डोक्यावर हात मारला. या महान हस्तीचा संपर्क होऊ नये म्हणूनच पक्याने सगळ्यांना फोन बंद करण्यास सांगितले होते. हा दत्त्या म्हणजे पराकोटीचा अपशकुनी माणूस. अर्थात सगळे योगायोगच म्हणा. पण या घटनेपासून त्याच्या अपशकुनीपणाच्या सगळ्या घटना डोळ्यासमोर स्लाईड शो करत निघून गेल्या आणि त्याच्या अपशकुनीपणावर नकळत विश्वास बसला.

           तशी ह्या अपशकुनी विनोदी पात्राची पहिली गाठ कधी पडली हे जरी स्पष्ट आठवत नसले तरी पहिला किस्सा स्मरणात आहे. वसतिगृहात रॅग्गिंगची भीती असल्यामुळे प्रथम वर्षात बाहेर खोली घेऊन राहायचा शिरस्ता होता. खोली समोरला रस्ता ओलांडला की एक भलं मोठं अपार्टमेंट लागायचे. त्यात माझे काही वर्गमित्र राहायचे. पण अगदी सुरुवातीला कोणीच कोणाला ओळखत नव्हते. नाही म्हटलं तरी गोप्या, किसना, जब्या यांची ओळख झाली होती आणि पक्या तर माझा खोली मित्रच होता. तर सर्वमताने पहिल्या श्रावण सोमवारी मंदिरात जाण्याचे ठरले. मी मंदिराकडेच काम असल्यामुळे परस्पर बाकीच्यांना सामिल होणार होतो. तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी खडकेश्वर येथील शिवमंदिरात आम्ही दर्शनासाठी रांगेत लागलो. पहिलाच श्रावण सोमवार असल्याकारणे आमच्या सारखे हवशे-नवशे सगळेच रांगेत असल्यामुळे तुफान गर्दी होती.
          
             "बाबो, इतकी गर्दी महादेवाला ओव्हर टाईम करावा लागतो वाटते आज." मागून एक अपरिचित आवाज आला. हळूहळू रांग समोर सरकत होती. स्पीकर वरून भक्तांसाठी सतत सुचना येत होत्या. रांगेत लागा, घाई करू नका, चांगल्या कामाला उशीरच लागतो, प्रशासनाला सहकार्य करा. याबरोबरच चपला कुठे काढाव्या, लहान मुलांना सांभाळा. पाकिटमार, खिसेकापू पासून सावधान. सोनं, मोबाईल अशा किंमती वस्तू सांभाळा इ.इ.
          
              "जे लोक फक्त श्रावण सोमवार सारख्या दिवशीच दर्शनाला येतात त्यांच्या मनोकामना कधीच पूर्ण होत नाहीत." परत तोच आवाज. आवाज तर ओळखीचा वाटत नव्हता, म्हणून मागे वळून पाहिले. सावळासा रंग, केस याने नीट लावले नव्हते की न्हाव्याने व्यवस्थित कापले नव्हते काय कळतं नव्हतं. पण त्यांची अवस्था गारपीटग्रस्त वा अतिवृष्टी झालेल्या पिकांसारखी होती. काही उभे, काही वाकडे अन काही एकदमच भुईसपाट. डाव्या हनुवटीवर ठळक उठून दिसणारा काळाकुट्ट मस. अंगात राखाडी रंगाचे शर्ट आणि पांढरी पँट(श्रावणात पांढरी पँट घालायला हिम्मत लागते भाऊ). पायात एकदम निकृष्ठ दर्जाची स्लीपर(पावसाळ्यात पांढऱ्या पँटवर स्लीपर घालण्यासाठी पार्श्वभागात दम असावा लागतो भावड्या). तर या स्लीपरमुळे पायाचा अंगठा आणि पहिलं बोट या मध्ये आपण पिठाची पातळ लापशी करतो ना अगदी तसंच द्रव खिदळत होतं. त्याच्या पँटची मागून काय हालत झाली असेल याची कल्पना मला आली. किसना मागून टपली मारून म्हणाला, "तुला काय करायचं बे लोकांच्या मनोकामनेशी. तु तुझं बघ ना."
प्रतिउत्तरात अनोळखी आवाज म्हणाला, "अरे ही काळ्या जबानीच्या भटाची वाणी आहे, तु बघ नाही तर कोणाचीच मनोकामना पूर्ण होणार नाही." आजही या वाणीत दम असल्याचा जाणवतो. खरं सांगतो आमच्या मनोकामना आटोकाट प्रयत्न करूनही आजवर पूर्ण झालेल्या नाहीत आणि पूर्ण होण्याची कुठलीही शक्यता अजूनतरी नजरेस पडत नाही..😢असो. त्याला इतक्या वेळ माझ्याकडून अपेक्षित प्रतिसाद न आल्यामुळे, मी त्याला ओळखत नाही हे त्याने लगेचच ताडून म्हंटले, "तु असा अनोळखी सारखा का वागतोस मी तुझ्याच वर्गातला आहे 'दत्तात्रय किटेकर'," हस्तालोंदनाचे आमंत्रण देत तो म्हणाला. म्हणजे अरेच्चा ही मागची बडबडी व्यक्ती सुद्धा आमच्याच बरोबर होती. मी लगेचच त्याला 'दत्त्या' म्हणून आमच्यातील(खरं म्हणजे माझ्यातील)अवघडलेपणा दूर केला.

          माझ्या समोर 2-3 म्हातारी लोक होती. त्यांना उद्देशून दत्त्या म्हणाला, "या म्हाताऱ्यांची काय मनोकामना राहिली बापा आता. पिकलं पान गळायचा तेवढा अवधी." यावर समोरील म्हातारीने मागे बघून दत्त्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला.
"पण काही म्हातारी लोकं सुद्धा किती जवान दिसतात नाही." यावर दर्शन होईस्तोवर परत कधी म्हातारीने मागे वळून पाहिले नाही. असेच दत्ताभाऊंचे टोमणे झेलत झेलत मुख्य गाभाऱ्यापाशी दर्शन घेत असता दत्ताचा आवाज आला, "प्रसाद". मागे वळून बघतो तर दत्ता चक्क पुजारीबाबा समोर हात पसरवत उभा होता. पुजारीने वाटीतली साखर देत असतानाच ,"साखर नको हो, नेहमीचा प्रसाद द्या ना पेढा." विचित्र हसत अजून दत्ता त्याच अवस्थेत होता. त्या बिचाऱ्या भटाने आपल्या अखत्यारितला पेढा काढून शिरजोर भटाच्या हातावर टेकवला. सुवर्ण पदक मिळाल्याच्या विजयी मुद्रेने आम्ही बाहेर पडलो. असा हा दत्त्या कधी काय म्हणेल, काय करेल याचा नेम नसायचा.

           एके दिवशी सकाळी 9 च्या दरम्यान एक सद्गृहस्थ वसतिगृहात आले. "पुरुषोत्तम आंबिवडेकर कुठे राहतो?"
किसन्या माझ्याकडे बघून नकारार्थी मान हलवत त्यांना म्हणाला, "या नावाचे कुणीच राहत नाही या वसतिगृहात."
"शासकीय मुलांचे वसतिगृह ना हे." 
किसन्या खिदळत म्हणाला, "शासकीय मुलांचे नाही हो, मुलांचे शासकीय वसतिगृह आहे."
मी त्याला ढोपराने शांत करत म्हंटले, "पण काका येथे पुरुषोत्तम आंबिवडेकर नावाचा कुणीच राहत नाही."
तेवढ्यात गोप्या आला, "काका तुम्ही ? या ना दत्तात्रयची खोली हवीय ना?"
गोप्या आणि दत्त्या 12 वीला सोबत शिकल्यामुळे यांचा परिचय होता. आम्ही मात्र दत्त्याच्या दुसऱ्या नावातच (पुरुषोत्तम आंबिवडेकर) गुरफटून गेलो होतो. एखाद्याची 2 नावे असू शकतात, पण इथे तर आडनावात पण झोल होता. या हस्तीच घरच नाव-आडनाव हजेरीपटवरल्या नावपेक्षा वेगळं होतं. कुणाचे पालक वसतिगृहात आले की, आम्ही त्यांना त्यांच्या पाल्याच्या खोलीवर तडक नेत नसू. पहिले किसन्याच्या खोलीवर नेत असू. किसन्याची खोली नेहमी स्वच्छ असे आणि पाल्याला सिगारेटची थोटकं, ऍश ट्रे(हा पाण्याच्या बाटलीला कापून तयार केलेला असे), माचिस, बियरच्या बाटल्या यांची विल्हेवाट लावायला थोडा अवधी मिळावा हे या मागचे प्रयोजन.

          किसन्याच्या बेडवर बसून बिपाशाच मादक चित्र न्याहाळताना काका म्हणाले, "ही पुरुषोत्तमची खोली नाही वाटते."(आमच्या भुवया उंचावल्या, मनात म्हंटले इथे तरी बिपाशाच्या अंगावर कपडे आहेत. मला दत्त्याच्या खोलीतलं मल्लिकाच अतिमादक चित्र आठवलं).
गोप्या म्हणाला, "हा त्याची खोली दुसरी आहे काका, तो आंघोळीला गेलाय. खोलीला कुलूप होतं. जाऊत आपण त्याची आंघोळ झाली की त्या खोलीवर."
" अरेरे 9 वाजता आंघोळ(जणू काही दत्त्याने धर्मभ्रष्ट केलाय असा भाव काकांच्या चेहऱ्यावर होता). घरी होता तेव्हा 6 वाजता पूजा करायचा. वसतिगृहात मुलं बिघडतात हेच खरं." अत्यंत त्रासिक चेहरा करून गळ्यातील रुद्राक्षाची माळ कपाळाला टेकवत काका म्हणाले. मी तेथे बिना दात घासायचा उभा आहे हे जर काकांना कळाले असते तर त्यांनी मला नक्कीच गोमूत्राने गुळणा भरायला लावला असता.(दत्त्याचे खरे कारनामे समजले असते तर काकाला आत्ताच I.C.U. मध्ये दाखल करावे लागले असते).

          तेवढ्यात दत्ता तेथे हजर झाला. जवळ जाऊनही हा दत्त्या आहे म्हणून ओळखू येत नव्हता. आज्ञाधारक मुलाप्रमाणे चपटा भांग, जीन्स-टी शर्ट, पायात adidas चा बुट(रोज संडासची चप्पल घालून फिरणाऱ्या दत्त्याकडे हे बुट आहेत हे पाहून आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले). आदिदासच्या बुटांवर 3 तिरप्या रेषा असतात पण इथे 4 होत्या. जवळ जाऊन पाहतो तर ते abidas चे बुट होते (मनात म्हंटल च्यायला या माणसाचं सगळंच नकली असतं). पावडर फासून सावळ्याचा सेमी-गोरा होण्याचा प्रयत्न झालेला दिसत होता.

           दत्त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर, 'ये है मेरा शेर बाकी तुम सब भेडियां' हा भाव होता. थोड्या वेळ किसन्याच्या रूमवर बसून मग आमची वरात दत्त्याच्या खोलीकडे निघाली. खोलीमध्ये चहूकडे चंदन अगरबत्तीचा सुगंध दरवळला होता(दत्त्याने पहिल्यांदा माचिसचा सदुपयोग केला असेल). बाकी खोली होती तशीच होती. फक्त सिगारेटची थोटकं, ऍश ट्रे, बियर बाटली कुठे दिसत नव्हती. बेडवरची चादर तिचं होती फक्त पलटी मारून अंथरलेली होती(एकाच चंदरीचा एवढा सुरेख आणि पुरेपूर वापर फक्त दत्त्याच करू शकतो). फॉरेन्सिक मेडिसिनच पुस्तक उघडून टेबलावर ठेवलं होतं(आतील पानांनी आज पहिल्यांदा खोली बघितली असेल). मल्लिकाची जागा श्री गणेशजींनी घेतली होती (दत्त्या नेहमी खिळ्यालाच चित्र का टांगत असे ते आत्ता समजलं होतं. बदलायला सोपं जातं म्हणून. त्याला बापाच्या धाडसत्राची पूर्वकल्पना असावी).आता दत्त्याच्या खोलीपुढे किसन्याची खोली म्हणजे रविवारचा बाजार वाटत होता. अशाप्रकारे अचानक धाड टाकलेल्या बापाला त्यांच्याच 'सव्वाशेराने' खुबीने कटवले होते. दत्त्याची खोली परत जैसे थे व्हायला अवघे 24 तास भरपूर होते.

          पुढच्या टाकलेल्या धाडीतही दत्त्या थोडक्यात वाचला होता. दत्त्या पहिल्या वर्षी नापास झाल्यानंतर काकांनी गोप्याला त्याला घेऊन अभ्यास कर अशी विनंती केली होती. गोप्यानेही ती उशिरा का होईना स्वीकारत शेवटच्या वर्षी त्या सोबत अभ्यास केला. दत्त्या तर काही पास झाला नाही, गोप्याचा मात्र एक विषय गेला. मोसाद एजंट प्रमाणे अचानक टाकलेल्या पुढच्या वर्षाच्या धाडीत मात्र दत्त्या गारद झाला. बापाला खोली माहीत झाल्यामुळे कुठलीही संधी न देता धाड पडली. सिगारेट, बियर बाटली सहित अगदी रेड हँड दत्त्या पकडल्या गेला. 10-15 दिवस बाप त्याला घरी घेऊन गेला. मस्त 'झंडू बाम ट्रीटमेंट' दिली असणार. याआधी पण त्याने पहिल्या वर्षी नापास झाल्यावर 10-15 दिवसाच्या सुट्ट्यांचा आस्वाद घेतलेला होता.

           घरून आल्यावर दत्त्या 'दत्तात्रय' बनला होता. सकाळी 6 ला आंघोळ करून तयार असायचा. पूजापाठही करत असेल कदाचित. एकूणच आमूलाग्र बदल दिसत होता. घरी बापानं दत्त्याचा मेंदू धुवून काढला होता(ब्रेन वॉशिंग). पण त्यावर लवकरच गंज चढणार याची आम्हाला खात्री होती. दत्त्या म्हणजे कुत्र्याची शेपूट होतं. नळीत घालता नळी वाकडी होईल पण शेपूट सरळ होणार नाही.

          दर महिन्याला घरून येणारे 5 हजार रु. घसरून 3 हजार झाले होते. पैसे कमी पाठवले तर याचे शौक बंद होतील असा बापाचा सरळ हिशोब. त्याला जेवण खावणासाहित आपले शौक पुरवणं अशक्य होऊ लागलं.
'संकट काळी जो मदत करतो तोच खरा मित्र' या उक्तीला जागून हळूहळू आम्ही त्याला सिगारेट शेयर करू लागलो. इतरही गोष्टींचं तसंच. दत्त्या परत माणसात आला. सिगारेट, बियर अगदी अगदी जैसे थे झालं. 3 हजारात शौक पूर्ण होत नाहीत म्हणून दत्त्याने एका पान टपरीवाल्याशी सलगी वाढवून उधारी केली. नियमित त्याकडून सगळे सिगारेट घेत असल्यामुळे त्याचा दत्त्यावर विश्वास होताच. तुम्हाला खोटं वाटेल पण वसतिगृह सोडण्याच्या आधीपर्यंत उधारीची थकबाकी होती तब्बल 25 हजार रुपये. यावर दत्त्याला छेडताच तो म्हणे, "एका पगाराची गोष्ट आहे ही फक्त." वैद्यकीय अधिकारी होऊन पहिल्या पगारात उधारी फेडतो म्हणून आधार कार्डची एक प्रत टपरीवाल्यापाशी ओळख म्हणून ठेवली होती. वरून बापाचा फोन नंबरही दिला होता. रुजू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जर उधारी फेडली नाही तर घंटी सरळ माधवराव किटेकरांच्या फोनची वाजणार होती. इतकं असूनही दत्त्या मात्र बिंदास होता. त्याची उधारी ऐकून आमचे दात घश्यात जायची वेळ आली होती.

          दुपारच्या जेवणानंतर अख्ख वसतिगृह अजगरावस्थेत पडलेलं असताना दत्त्या आणि मी चकाट्या पिटायचो. त्यात जागतिक दर्जाचे विषय चर्चिले जायचे. त्यापैकीच एक म्हणजे दत्त्याचं लग्न. म्हंटल,      "दत्त्या तुझ्या लग्नात लय मजा येणार लेका."
 "छ्या आपण नाही करणार लग्न." दत्त्या म्हणाला.
याला मधात मधात असे झटके येतात हे माहीत होतं पण तरी दुपारी असही काय करणार म्हणून मी चर्चा पुढे रेटत विचारलं, "का रे ?"
पलंगावरून उठून दत्त्याने खिडकीत ठेवलेली मधाची वाटी माझ्या हाती दिली. त्याला भरपूर माश्या बिलगलेल्या होत्या.दत्त्या म्हणाला, "यातली एकतरी माशी हाकलून लाव."
मी थोडा प्रयत्न केला पण लगेच लक्षात आलं. म्हंटल, "अरे यांच्या पंखांना मध चिटकल्यामुळे त्यांना उडता येत नाही.'
दत्त्या म्हणाला, "मोह, वासना पण अश्याच असतात. त्यांच्या मागे लागलं की आपण पण त्यात खोल खोल गुंतत जातो आणि कधी आपल्या पंखांना मध चिटकत कळत पण नाही. आपल्याला होणारी पोरं त्यांच्या सोबत परत 'अबकड' शिकायचं म्हणजे अधोगतीच नाही का. सगळं सोडून त्यांच्या मागे लक्ष ठेवा, त्यांना मोठं करा. कशासाठी तर आनंद मिळतो म्हणून, कशासाठी तर म्हातारपणाच्या आधारासाठी. आज ज्यांना मुलं आहेत ते सगळे सुखी आहेत का. काहींना तर मुलं वागवत नसल्यामुळे, मुलं नसती तर ती जास्त सुखी असती अशी परिस्थिती आहे. ही सगळी स्वप्न सत्यात उतरली असती तर वृद्धाश्रम स्थापन झाले असते का." असा हा आमचा दत्त्या कधी कधी टोकाची भूमिका घेई. पण पुढच्याला विचार मात्र करायला लावे. थोडा वाव भेटला की समोरच्याला आपल्या तत्वज्ञानाचे डोस पाजे. रोज कॉलेजच्या पोरी खालून वरून न्याहाळणारा हा आणि याला अचानक इतकं ज्ञान कुठून प्राप्त झालं तेच मला कळेना. त्याच्या लग्न संकल्पनेवर भरपूर वाद-विवाद घालावेसे वाटत. पण काही माणसांचं फक्त ऐकायचं असतं, अशी त्याची वर्गवारी होती.

          भारतीय पुरुष संघाचा कुठलातरी क्रिकेट सामना चालू होता. आपली फलंदाजी सुरू होती. सगळे उपहारगृहात सामना बघत बसले होते. दत्त्या आला नी म्हणाला, "काय झाला रे स्कोर."
त्याच बॉल ला विकेट पडली. सगळे दत्त्याकडे पाहायला लागले. त्याला कॉल आला म्हणून सगळ्यांच्या नजरा चुकवत तो बाहेर चालला गेला. थोड्या वेळाने चुपचाप येऊन एकदम मागे माझ्या बाजूला बसला. 2 मिनिटांत परत 2 विकेट पडल्या. समोर बसलेल्या दिन्याने मागे वळून कुठे दत्त्या आहे का पाहिले.
तेथूनच तो ओरडला, "दत्त्या उठ भो**च्या ऑल आऊट करतो की काय आता." सगळ्यांच्या रेट्यामुळे दत्त्याला तेथून उठावे लागले. विकृत हसत दत्त्या बाहेर पडला. 

            दत्त्या गेल्यावर टीमची गाडी रुळावर आली. चांगली 100-150 धावांची भागीदारी झाली. नाही म्हणायला मधात 2-3 विकेट गेल्याच म्हणा. पण त्यांनीही थोडाफार हातभार लावल्यामुळे भागून गेलं. पण परत गळती लागली. 2-3 विकेट सलग पडल्या दिन्याने परत मागे वळून पाहिले. पण दत्त्या कुठे सापडला नाही. अखेर शेवटचीही विकेट पडली. शेवटच्या 4 फलंदाजांना एकूण 20 धावाही काढता आल्या नाही. म्हंटल बघा दत्ता नसतानाही विकेट पडल्याच की नाही. उगाच आम्ही सगळे त्याला बिचाऱ्याला अपशकुनी म्हणून सहभागी करत नव्हतो. उठताना माझं लक्ष उपहारगृहाच्या डाव्या खिडकीत गेलं. मला घेरी यायचीच बाकी होती फक्त, कारण दत्ता खिडकीतून सामना बघत होता.

           असा हा आमचा आवली दत्ता. त्याला चिडवल्याचंही काहीच वाटत नसे, राग तर अजिबात नाही. कुठे महत्वाच्या कामाला बाहेर जायचं असेल तर कधी कधी आपणहूनच म्हणे, "मी राहतो इथेच उगाच तुमचं काम अडायचं माझ्यामुळे." त्या वेळी मात्र त्याची खूप कीव येई. अशावेळी आम्ही त्याला, "तू चल रे भावा काम नाही झालं तरी चालेल. कोई दोस्त पनौती नहीं होता और दोस्त से बढकर कोई काम नहीं होता." असं म्हणत असू अन काम नाही झालं की त्यालाच शिव्यांची लाखोली वाहिली जाई. एकदा मित्रांसोबत गोवा जायला निघालो. निघायच्या आधी दत्त्याचा फोन. गोव्याला जाईपर्यंत इतक्या अडचणी आल्या की सांगता दम लागेल. अक्षरशः चष्मा तुटण्यापासून ते महामंडळाची बस पंक्चर होईपर्यंत. गोवाची हवा अर्ध्या रस्त्यातच गेली होती.

          वसतिगृहात 'शनी लागणे' च्या ऐवजी ' दत्तू किटे ची सावली पडली की काय ?' असा नवीन वाक्प्रचार उदयास आला होता. आपण सगळे विज्ञानाचे विद्यार्थी आहोत. आपल्याला अशा अपशकुनी, पनौती, शनी ह्या गोष्टी शोभत नाहीत मान्य. पण असं खरंच घडत होतं. काही महत्वाच्या निर्णयात याला माणुसकीच्या नात्याने सामिल करावं तर ते काम अडून बसे. म्हणून सगळे याला महत्वाच्या वेळी टाळत. अगदी परीक्षेच्या आणि निकलाच्या दिवशी याच्या खोलीची बाहेरून कडी लावण्यात येई. याचं तोंड दिसू नये म्हणून. पास झाल्यानंतर मात्र पहिला पेढा दत्त्यालाच भरवण्यात येई. तोंड दाखवलं नाहीस म्हणून. अशाप्रकारे दत्त्याला जीवपण तेवढाच लावल्या जाई. वसतिगृहातल्या बहुतांश पार्ट्यांना दत्त्या हजर असायचा. त्याच्याशिवाय पार्टी म्हणजे बिना विदूषकाची सर्कस. दत्त्यामुळे पार्टी एका वेगळ्याच कक्षात जाई. चकण्यासाठी खाली पेपर टाकण्यापासून ते पॅक भरण्यापर्यंत सगळी महत्वाची कामे त्याकडे असत. पॅक भरता भरता एखाद्या नवशिख्याला तो ज्ञानाचे 2 थेंब पाजवूनच टाके. खाली पेपर टाकताना दुहेरी टाकावा, तेलकट वा ओलसर पदार्थ पेपरवर कधीच ठेवू नये. चकना खाताना गरम गरम पदार्थ आधी खावेत, बियर असल्यास पॅक भरताना 45 अंशाच्या कोनात भरावा इ.इ. पार्टीत तो भडक लाईट नेहमी बंद करण्यास सांगे. त्याने दारू कमी चढते म्हणे. गाण्याची पसंती पण शांत, काळीज चिरत जाणाऱ्या दर्दी गाण्यांना असे. पार्टीचा माहोल एकदम मादक होई. न पिणाऱ्यांना पण झिंगल्यासारखे वाटे आणि पिणाऱ्यांची अवस्था तर आपण इंद्र दरबारात आहोत की काय अशी होई. इंद्र अर्थात 'दत्तात्रय किटेकर'. खिशात खडकू नसताना भावाच्या पार्ट्या कधी चुकल्या नाहीत. सगळे त्याला हातचा एक म्हणून बिनाटिकीट सामिल करून घेत.

          दत्त्याच्या भावांमध्ये पण त्यासारखेच काहीना काही खट्याळ गुण होते. दत्त्या शेंडेफळ, मधला भाऊ खूप हुशार (असं ते म्हणतात), आणि मोठा भाऊ या सगळ्या खटाळ्यांचा विभागप्रमुख. मोठा महेश मुंबईला असे तर मधला जयेश पुण्यात. घरी जातांना यांना औरंगाबादवरून जावे लागे. मग सुट्टयात नेहमी आमच्या वसतिगृहात दिसत. मधल्या हुशार भावाशी अशीच एकदा गाठ पडली. गोप्या त्याला म्हणाला, "चला सिनेमाला जाऊ."
"कोणत्या...?" जयेश तोऱ्यात म्हणाला(हे साहेब नेहमी तोऱ्यातच असतात).
"सरबजीत..!" गोप्या.
"पाहिला आहे मी."अगदी त्याच तोऱ्यात.                  याचा तोरा पाहून मला खरं तर बोलायचा कंटाळा आला होता. पण तरी मित्राचा भाऊ काय नि आपला भाऊ काय एकच म्हणून मी म्हंटल, "थेटरात पाहिला का ?"
"नाही मोबाईलवर." जयेश.
"अरे पण आजच आला ना सिनेमा लगेचच मोबाईलवर कसा येणार." गोप्या आश्चर्याने म्हणाला.
"पुण्यात त्याच दिवशी येतो मोबाईलवर प्रत्येक सिनेमा." 
हा गमतीने बोलतोय का तेही आम्ही तपासून पाहिले, पण तो खरंच गंभीर होता. गोप्या आणि मी एकमेकांकडे पाहत काहीही न बोलता तेथून काढता पाय घेतला. हे म्हणजे सरळ सरळ आम्ही औरंगाबाद मध्ये राहतो म्हणून मागास म्हणण्यासारखे होते. माणसाने कुठपर्यंत पुड्या सोडाव्यात यालाही काही मर्यादा असावी. हा भाऊ B.A.M.S. होता. आयुर्वेद शास्त्राच्या प्रगतीचे अडथळे झटकन माझ्या लक्षात आले.

          मोठा भाऊ महेश आम्ही पहिल्या वर्षात असताना तो अंतिम वर्षात होता. आम्ही अंतिम वर्षात आलो तरी त्याला अंतिम वर्ष सोडावं वाटत नव्हतं. कित्येक बॅच त्याला ज्युनिअर च्या सिनियर झाल्या असतील. पण पडलो तरी नाक वरचं. वाढत्या वयात पोराचा आनंद हिरावून घेता कामा नये, म्हणून कंटाळून समजदार बापानं पोराचं लग्न लावून दिलं. काही दिवसांत बाप(महेश) कॉलेजात तर लेकरं शाळेत बसून डब्बा खातील. पण हा भाऊ काय पास व्हायचा नाही. दत्त्याला सहजच एके दिवशी विचारलं, "तुझा मोठा भाऊ काय करतो रे ?"
तो निरागसपणे म्हणाला, "K.E.M.ला आहे अंतिम वर्षात." ऊर भरून आला. म्हंटल बघा भाऊ इतक्या सुप्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना सुद्धा चेहऱ्यावर थोडाही अहंभाव नाही. सगळ्या वसतिगृहात दत्त्याच्या सुशिक्षित परिवाराची जाहिरात आम्ही करून टाकली. जाहिरातीचा पहिला बकरा होता 'अन्या.' 
मोठ्या भावाचे वसतिगृहात आगमन होताच, मार्गदर्शन घ्यायला अन्या हजर.
"सर कोणते पुस्तक वाचू, क्लास कोणते लावू, ठराविक वाचू की सगळं वाचू इ.इ." असंख्य प्रश्न विचारले.
महेशनेही लगेचच प्रतिसाद न देता, एक सराईत डॉक्टरप्रमाणे पहिले हात-पाय, तोंड धुवून आला. कपडे बदलले, आरशात बघून केस नीट लावून घेत म्हणाला,  "त्याच असं आहे ना, आमच्या मुंबईत मुलं अमके अमके पुस्तक वापरतात, क्लासच विचाराल तर हेच छान आहेत. तशे तेही चांगले आहेत म्हणा, पण मला विचाराल तर मी हेच सुचवेन इ.इ." अहो इतकंच काय,काय काय वाचायचं हे देखील सांगितलं. वैद्यकीय क्षेत्राविषयी भरपूर मार्गदर्शन केले. आम्ही सगळे भारावलो. म्हंटल भाऊ असावा तर असा. आम्ही तेव्हा जेमतेम पहिल्या वर्षात असल्यामुळे आम्हाला वैद्यकीय क्षेत्र एवढं परिचयाचं नव्हतं. काही दिवसांनी डॉ.महेश किटेकर यांची मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट(मराठीत काय म्हणतात बुवा) आली. प्रोफाईल तपासताच मला धक्का बसला. भाऊ K.E.M.रुग्णालयात फिजिओथेरपी करत होते. हे तर चहावाल्याने यशस्वी उद्योगपती कसे व्हावे असे सांगण्यासारखे होते(फिजिओथेरपी वाल्यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. पण त्यांनी M.B.B.S. वाल्यांना मार्गदर्शन करणे सुद्धा पटत नाही ना.  :)
वास्तविक त्यांच्या अभ्यासक्रमापेक्षा आमचा खूप सखोल असतो. तरी त्याने सगळं आत्मविश्वासाने आमच्या माथी मारलं होतं. यावर चिडून सगळे दत्त्याच्या खोलीवर जाताच बत्तीशी दाखवत तो म्हणाला, "मी कुठे म्हणालो तो M.B.B.S. आहे म्हणून. मी फक्त K.E.M. ला आहे म्हंटल." असे हे किटेकर म्हणजे जरा विचित्रच होते.

           एकदा मोठा भाऊ आणि दत्त्या मुंबईला जात होते. रेल्वेत जागा आरक्षित केलेली होती. जागेवर बसताच थोड्या वेळाने एक जोडपं येऊन ही जागा आमची असल्याचा दावा करू लागलं. भरपूर वेळ यांची हुज्जत चालू होती. कोणीच नरमाईने घेईना. त्या जोडप्याचा जागा क्रमांक, बोगी क्रमांक सगळं बरोबर होतं. दत्त्याचही बरोबर होतं. रेल्वे विभागाकडून अशी चूक कशी झाली याने सगळे अचंबित झाले. तरी त्यांची हुज्जत घालणे सुरूच होते. एका भल्या गृहस्थाने मध्यस्थी करत दोघांची तिकिटे पुन्हा तपासली. दत्त्याकडे चष्म्याच्या वरून बघत जवळ जवळ तो खेकसलाच, " कालच आहे हे तिकीट." जोडप्यातल्या पुरुषाने या दोघा भावांना अक्षरशः धक्के मारून बाहेर काढलं.

           या सगळ्या कुटुंबात वडील मात्र खूप हुशार आहेत. आपल्या मुलांची हुशारी लक्षात घेता त्यांनी सगळ्या भावांची 11-12 डोंगरी विभागात (hilly area) करून घेतली आणि लगेचच आरक्षण काढून घेतलं. 2 भावांनी याचा यथोचित फायदा जरी घेतला नसला तरी शेंडफळाने अडकेपार झेंडा फडकवला. अवघ्या 146 गुणांवर त्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. या कुटुंबाची विना आरक्षण कल्पना ही करवत नाही...

                    --------------*--------------

                पार्टीचे निमित्त होते दत्ता M.B.B.S. पूर्ण झाल्याचे. नेहमीचेच वळू हजर असल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. इथून पुढं सगळ्यांचे रस्ते वेगवेगळे असणार होते. भेट झालीच तर तो निव्वळ योगायोग असणार होता. आजवर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. पण पहिल्या श्रावण सोमवारी कोणाचीच मनोकामना पूर्ण होणार नाही असं सांगणाऱ्या दस्तुरखुद्द दत्तूभाऊंनी काय मनोकामना मागितली होती याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. त्याअनुषंगाने जब्याने दत्त्याला छेडताच सगळ्यांच्या नजरा दत्त्यावर रोखल्या होत्या. दत्त्यानेही चोरटा कटाक्ष सगळ्यांकडे टाकत शांतपणे खाली मान घालून उत्तर दिले, "देवा, ह्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे...!"
(त्यानंतर मात्र आम्ही आमच्या त्या मनोकामना कधीतरी पूर्ण होतील अशी भाबडी आशा सोडून दिली).

Comments

  1. अप्रतिम वर्णन.
    .
    .
    .
    या दत्त्याच्या अपशकुनाची तोड मला सापडली आहे...
    दोन-तीन महिन्यांपूर्वी रिअल माद्रिद(रोनाल्डो) आणि बार्सिलोना(मेस्सी) यांच्यात सामना सुरू होता...कुठून तरी दत्त्याला सामन्याची खबर लागली आणि तो सामना बघायला आला... त्याच्या अपशकुनाचे रेकॉर्ड लक्षात घेता आम्ही त्याला मुद्दामूनच माद्रिदला सपोर्ट करायला भाग पाडले...तो सामना मेस्सी ने शेवटच्या मिनिटाला गोल मारून जिंकला.😂😂
    धन्यवाद "दत्तू किटे."

    ReplyDelete
    Replies
    1. जिंकण्याचं साधं तंत्र...दत्त्याला आपल्या विरोधकाच्या समर्थनार्थ पाठवायचं😂

      Delete
  2. या दत्तू किटे ला अभ्यासात थोडी मदत केली तर दत्या ने माझा पासिंगचा result 6महिने लांबवला... असा मी अभागी गोपी

    ReplyDelete
  3. आपला गोपी पण दत्ताला कमी नाही , सकाळच्या शो चे टिकीट काढतो अन् रात्री पिचरला घेऊन जातो ...

    ReplyDelete
    Replies
    1. हो 'भिकारी' चित्रपटाच्या वेळी घडला होता हा किस्सा😂

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

जैविक व रासायनिक ब्रम्हास्त्रे भाग-१.

       .             ऑगस्ट 1906 साल अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य. ऑईस्टर बे या नासाऊ प्रांतातील शहरात एका आलिशान घरात एक मुलगी आजारी होती. त्या काळात अमेरिका आता इतकी जरी पुढारलेली, प्रगत, आत्ममग्न नसली तरी त्या मुलीच्या आजारपणाशी बाकीच्यांचा संबंध येण्याचे वा इतका गवगवा होण्याचं काही एक कारण नव्हतं. ज्या घरात ती आजारी होती ते घर नेहमी पर्यटकांसाठी भाड्याने दिल्या जात असे. अश्याच पर्यटकांपैकी ती सुद्धा तिच्या परिवारासमवेत येथे सुट्ट्यांचा आनंद लुटायला आली होती. घर प्रशस्त आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे कोणत्याही पर्यटकास चटकन पसंत पडे. पण ऐनवेळी आजारी पडल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला होता. इतर सदस्य तिची सर्वतोपरी काळजी घेत होते. पण तरी तिचा ताप काही केल्या उतरेना. लक्षण टायफॉईडची (विषमज्वर)असल्याचे बोलले जात होते. कारण इतरत्र टायफॉईडचे रुग्ण आढळले होते. वर्तमानपत्रातही टायफॉईडच्याच बातम्या येत होत्या. साथच असावी बहुदा. म्हणून रोगाच्या निदानाची घरातल्या लोकांनाच चटकन कल्पना आली. पण दुर्दैवाने घरातील इतरही 6 सदस्य लवकर आजारी पडले. अगदी त्याच लक्षणांसहित. आता मात्र बाब गंभीर होती. घरातील

पैठणी दिवस भाग-२

   .                ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सरांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज.             संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला. पाणी आणि आकाश इतके बेमालूमपणे एकमेकांत गुंफले होते की, त्यांना विभिन्न करणे केवळ अशक्य.              वेळापत्रकानुसार 2 जणांना अपघात विभागात 24 तास आपल्या कामावर हजर रहावे लागे. पैकी रात्री रुग्ण आला तर मामा (वर्ग 4 कर्मचारी) खोलीवर बोलावण्यास येई. उर्वरित सर्वांना बाह्यरुग्ण विभागात (ओ. पी. डी.) 2 वेळा जावे लागे. सकाळी 10-1 आणि दुपारी 2-4 हे कामाचे तास सोडले तर इतरवेळी तुम्ही काहीही करू शकत होतात. कामाच्या वेळी सुद्धा आम्ही बरीच दिरंगाई केली